Search This Blog

Thursday, 23 October 2014

!! अस्तंबा (अस्वस्थामा) ऋषींची यात्रा !!

           !! अस्तंबा (अस्वस्थामा) ऋषींची यात्रा !! 



 
 तळोदा :कधी खोल दरी, पाय थोडाही घसरला तरी जीव गेल्याशिवाय राहणार नाही, असा हा खडतर रस्ता आहे. अर्थात याही परिस्थितीत हजारो भाविक मोठय़ा श्रद्धेने अश्‍वत्थामाच्या दर्शनाला येत असतात.मध्य प्रदेश आणि गुजरातमधील भाविकही पायपीट करून या यात्रेला येतात. वर शिखरावर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी अश्‍वत्थामाची प्रतिकृती म्हणून एक दगड आहे.तेथे मोठय़ा श्रद्धेने लोक याठिकाणी नवस करून नारळ फोडतात व पूजाअर्चा करतात. त्यानंतर पुन्हा परतीच्या मार्गाला लागतात. या शिखरावर अतिशय कमी जागा असली तरी तेथे प्रत्येकाला बसायला जागा मिळते. हा अश्‍वत्थामाचा चमत्कार असल्याचे लोक सांगतात. या शिखरावरून सृष्टीच्या खर्‍या सौंदर्याचे दर्शन घडते. येथून दिसणारा सूर्योदय तसेच तापीचे विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही. याठिकाणी जाण्याचा व परतीचा मार्ग वेगळा आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपुड्यातील अस्तंबा यात्रोत्सवास धनत्रयोदशीच्या दिवशी सुरुवात होते. सातपुड्यातील पर्वत रांगेतील तिसर्‍या पर्वतावर अस्तंबा ऋषींचा यात्रोत्सव भरतो. या यात्रोत्सवासाठी भाविक धनत्रयोदशीच्या आदल्या दिवसापासून दाखल होतात. ही यात्रा तळोदा शहरापासून सुरू होते.सातपुडयातील उंच डोंगर....



दोन्ही बाजुला असलेल्या हजारो फुट खोल दरी....
नागमोडी खडतर रस्ता..
अन शिखरावर असलेले अस्तंबा ऋषीचे विश्राम स्थान.अस्तंबा ऋषीच्या दर्शनाची ओढ़ घेवुन घोषणा करीत भाविक हजारो फुट शिखर सहज चढतात.  निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते. म्हणुनच या यात्रेला येणा-या भाविकांची संख्या वर्षानवर्ष वाढत आहे. समुद्र सपाटीपासुन ४ हजार फुट उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचे देवस्थान आहे. भाविकांची अपार श्रधा असल्याने हाती भगवा झेंडा घेत `अस्तंबा ऋषी महराज की जय ' चा जयघोष करीत भाविक पदयात्रेने हजेरी लावतात. दिवाळीच्या पर्वावर धनत्रयोदशीला यात्रोत्सवाला प्रांरभ होत असते. शापस्थ अवस्थेत जखमांनी विव्हळणारा अश्वस्थामा आपल्या जखमांसाठी सातपुडयाचा द-याखो-यात तेल मागतो. आजही शिखरावर जाणा-या यात्रेकरूंणा तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन करतो, अशी अस्तंबा ऋषीचे दंतकथा आहे. अश्वस्थामा यांचा महाभारतात उल्लेख असला तरी त्यांचे स्थान भारतात कुठेही आढळत नाही. मात्र अश्वस्थामा ( अस्तंबा ) उल्लेख सातपुडयाच्या कुशिमधे उंच शिखरावर असल्याचे दिसुन येते. दिवाळीच्या पर्वाला अस्तंबा ऋषीच्या यात्रेला प्रारंभ होतो. तळोदा येथुन एक दिवस अगोदरच कॉलेज रोडपासुन वाजत-गाजत मिरवणुकीने मंदिराचे दर्शन घेवुन यात्रेकरू अस्तंबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात.

कोठार, देवनदी, असली, नकट्यादेव, जूना अस्तंभा, भिमकुंड्या या मार्गाने अस्तंबा ऋषी यात्रेला जातात. रानटी श्वापदांना दूर ठेवण्यासाठी ढोल, आगीसाठी टायर, दिवट्या, टेंभे,मशाली अशा दिर्घकाळ जळणार्या वस्तू या यात्रेत घेतल्या जातात. रात्रीचा प्रवास करुण अस्तंबा ऋषीच्या शिखरावर जाऊन धनत्रयोदशीला पहाटेच्या सुमारास दर्शन घेवुन ध्वज लावतात. सुमारे तीन दिवस ही यात्रा पूर्ण केली जाते. एकवेळा, पाच वेळा, अकरा वेळा यात्रा करण्याचा नवस बोलला जातो. चिरंजीव अश्वथामा पुजण्यामागे केवळ एक श्रध्दा आहे. त्याच्यासारखे दिर्घायुष्य मिळावे यासाठीच कदाचित ही यात्रा असते असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यानंतर आदिवासी बांधव तळोदा येथे एकत्रित येवुन ढोल ताश्याचा गजरात भव्य मिरवणुक काढतात. त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथील पावबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात. या पदयात्रेदरम्यान डफच्या तालावर ठेका घेत `अस्तंबा ऋषी की जय ', `पावबा ऋषी की जय' असा जयघोष करुण नृत्य करतात. त्यानंतर पदयात्रा पुर्ण करुन परतीच्या प्रवास करीत घरी परततात. हे भाविक यात्रोत्सवात सुरुवात करताना गोर्‍यामाळ, चत्र्यादेव अशा टेकड्या पार करीत शेवटी अस्तंबा ऋषींचे दर्शन घेऊन तेथून नकट्यादेव, जुना अस्तंबा मार्गे मामा-भाचा टेकडी, देवनदी व चांदसैली घाट मार्गे कोठार येथून परत येत असतात.
 हे सर्व भाविक दिवाळीच्या आदल्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघतात. अस्तंबा ऋषींचा यात्रोत्सव भाविक दिवाळीच्या दिवशी सांगता करीत असल्याने सर्व भाविक शहराजवळील शेतमळ्यावर मुक्कामाला थांबले आहेत. तेथून तळोदा महाविद्यालयापासून वाजत-गाजत मिरवणुकीने शहरातील हनुमान मंदिराचे दर्शन घेतात.भाविकांचे मोठमोठे जत्थे दाखल होतात हे दृश्य तळोदा शहरात पाहायला मिळतात. तळोद्याजवळ मुक्काम करतात.

!! अस्तंबा (अस्वस्थामा) ऋषींचा काही इतिहास !!

कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र आणि सप्तचिरंजीवांपैकी एक. याच्या कपाळी जन्मापासूनच एक मणी असतो. अर्जुनाइतकाच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत. द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारल्यानंतर पांडवसेनेवर त्यांनी तिखट हल्ला चालू केला. पांडवांची बाजू मार खावू लागली. द्रोणाचार्य यांचा आपल्या मुलात अतिशय जीव आहे हे श्रीकृष्णाला ठावूक असते. अश्वत्थामा मेला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आले तर ते दिग:मूढ होतील आणि युद्ध करण्याची इच्छा त्यांना राहणार नाही. द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावायचा हाच एक उपाय आहे हे कृष्णाने युधिष्ठिराला पटवून दिले. तेंव्हा भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने 'अश्वत्थामा मेला' अशी अवई उठवली. रणधुमाळीत सत्य कोण सांगेल असा प्रश्न त्यांना पडला. तेंव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी मनुष्य म्हणून युधिष्ठिराला विचारले की खरच अश्वत्थामा मेला काय? परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने 'नरो वा कुंजरो वा' असे उत्तर दिले. या धक्क्याने द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवले. दृष्टूद्युमनाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला. पुढे अश्वत्थाम्याने त्याचा वध करत याचा बदला घेतला. अश्वत्थम्याने महाभारत युद्धात कौरावांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले. युद्धं संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यूपन्थास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधारात पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी तो कापून आणतो. यावर संतप्त पाण्डव त्याला शोधत येतात. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रम्हास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रम्हास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्युची पत्नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतपर्यंत तू ही जखम कपाळी घेऊन दारोदार या जखमेसाठी लोकांना तेल मागत फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानल्या जाते.
अश्वथामा तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता. शास्त्रामध्ये अश्वथामा अमर असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment